नासिक वाल्या बायकांचे म्हणणे बरोबर नव्हते, डोल्या होत्या , फक्त त्यासाठी रांगेत थांबावे लागणार होते. तब्बल ३ तासां नंतर आम्ही डोलीत विराजमान झालो. देवाची पालकीतील मिरवणूक पाहिली होती, पण हे असे जिवंतपणी ४ जणांनी आपल्याला उचलून चालणे ! एकीकडे गम्मत वाटत होती, तर एकीकडे त्या माणसांची दया येत होती, पोटाची खळगी भरण्यासाठी, काय काय करावे लागते ह्याची जाणीव झाली, कांही लोक तर कंडीत बसली होती.चहाच्या मळ्यात पाने खुडनार्या बायकांच्या डोक्यावर असते तशी ही बुरुडाची बुट्टी , त्यात प्रवाश्याला बसवून एक माणूस ती बुट्टी आपल्या पाठीवर घेऊन चालतो, ह्याला पिट्टू असे ही म्हणतात. वाटेत ह्या माणसांना खायला प्यायाला देऊन आपली अपराधी पणाची भावना जरी कमी झाली, तरी रुखरुख रहातेच
बरेच जण पायी जात होते, तर कोणी घोडीवर सवार होऊन, वाहका बरोबर स्वारीला पण बरेच सांभाळून राहावे लागते. मार्गावर प्रत्येक की. मी. वर असलेल्या पाणपोई आणि निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी असलेली स्वच्छ शौचालये पाहून उत्तरखंड सरकारची तारीफ केल्या शिवाय राहवले नाही.
आजच्या आधुनिक युगात खंर तर येथे रोप वे करणे कठीण नाही, पण उत्तर आंचल सरकारने ते न करून एक तर त्या स्थानाचे मुळ स्वरूप टिकवले आहे नाही तर त्याला यात्रा पेक्षा पिकनिक स्पॉट चे क्षेत्र म्हणून बघितले गेले असते. दुसरे म्हणजे डोली, कंडी किंवा घोडीवाले ह्यांच्या पोटावर पाय दिला नाही. ही माणसे ६ महिने मेहनत करून कमावतात आणि त्या बेगामीवर पुढील ६ महिने गुजारा करतात. मला उत्तर खंड पेक्षा उत्तर आंचल हे नाव जास्त रास्त वाटते , कारण हा भाग खरेच आपल्या देशेचा आंचल(पदर) आहे , जो देश्याच्या अब्रूचे रक्षण करतो.
एकीकडे उंचच उंच पर्वत, तर दुसरीकडे खोल दरी, अलकनन्देचा खळ खळाट, मार्गावर मधेच अंगावर येणारे धबधब्यातील तुषार , मधेच धुके, मधेच उन, तर मधेच पावसाची एखादी झिरीप. काळ्या ढगांच्या रेपेरी कडा, मधेच इंद्रधनुच्याचे दर्शन, काय काय पहावे, काय काय डोळ्यात सामावावे समजत नव्हते.
स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते ह्या पेक्षा कांही निराळे असेल का, असे सारखे वाटत होते. प्रत्येक इंचावर निराळे रमणीय दृश्य ," देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी" असे कांहीसे वाटले, कारण निसर्ग भरभरून देत होता, आमची पहाण्याची शक्ती कमी पडत होती. १४ की. मी. चा रस्ता कापण्यात ६ तास भुर्कन उडून गेले.
आम्ही केदारानाथाच्या पवित्र भूमीवर उभे होतो, समोर बघितले तर महाराष्ट्र मंडळाचा फलक दिसला, छान वाटले, माणूस कोठेही जाओ आपली माती आपली माणसं हे विसरत नाही. महाराष्ट्र मंडळात गेलो , व्यवस्थापक सुनील कर्नाटकी नाव वाचून विरोधाभाचा आभास झाला. पण त्या कर्नाटकी आडनावाच्या मराठी माणसाने आमची रहाण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केली.......
रूमवर स्थिरस्थावर होईपर्यंत एक पंड्या आला, दुसर्या दिवशी होणार्या पूजेविषयी चर्चा केली, आमची शारीरिक अडचण पाहून, आम्हाला लगेच केदार्नाथाच्या दर्शनाला रांगेत उभे न करता गाभार्यात घेऊन गेला, ज्या दर्शनासाठी एवढी आटापिट केली, ते दर्शन इतक्या जवळून आणि इतक्या सहजपणे झाल्याने धन्य वाटले, पण तो इसम पुन्हा दुसर्या दिवशी आला नाही, पुन्हा दिसला नाही, त्यांनी आमच्या कडून कांहीही घेतले नाही , इथे देवाची अनुभूती
झाल्या सारखे वाटले. दुसर्या दिवशी पहाटे ३ वाजता सर्वजण दर्शनाला गेले, मी मात्र, आदल्या दिवसाच्या त्या अचानक झालेल्या दर्शनाने एवढा भारावला
होतो की मी रूमवरच राहिलो.
सकाळी ७ वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही प्रत्येक जण आप आपल्या डोलीत बसलो . डोलीवाल्यांनी आप आपली बोझी उचलली व चालण्यास सुरुवात केली. परतीचा प्रवास मात्र खूप हिम्मतीचा आणि त्रासाचा होता, घोड्यांची लीद, पावसाने झालेला चिखल, धबधब्याचे पाणी, उतारावरून भरभर चालताना घसरणारे त्या बोइंचे पाय , निसर्ग पहाण्याचा मोह , ह्या सर्व दिव्यातून जाताना शरीर सांभाळताना जी तारांबळ होते ती वर्णन करणे कठीण, माकड हाडाचे माकड हाल होतात., पण हे थ्रील पण अनुभवण्यात एक थ्रील होते. डोलीतून उतरून पिट्टूतं बसून गोरीकुंडाच्या पार्किंग पाशी आलो. गाडी आमच्या वाटे कडे डोळे लाऊन बघत होती. एव्हाने ३ वाजले होते. कोणालाही भूक नव्हती , सगळे पटापट गाडीत जाऊन बसले , पुन्हा वळणा वळणाच्या रस्त्यावर निसर्ग रम्य वातावरणात गाडीने बद्रिनाथाच्या दिशेने धाव घेतली. प्रत्येक वळण कठीण, वाहन चालकाच्या कौशल्याचे कौतुक करावेसे वाटले कोठे गोंधळ नाही हसत मुखाने विनोद करत तो गाडी चालवत होता. संध्याकाळ होत आली, धुके पसरलेले होते, सर्वांच्याच मनात एक अनुभित भीती होती. लड्डा नी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली, कांही सुंदर भजने पण गायली, सर्वाना जरा धैर्य आले.
चोपटा नावाचे एक गाव आले , एका बाजूला दोन लाकडाची घरे तेथे प्रवासांच्या सोयीसाठी उपलब्ध होती. पुढच्या थांब्या साठी २५ की. मी. जावे लागणार होते . कांही जणांचे म्हणणे पुढे जावे म्हणजे रहायला सोयीची जागा मिळेल असे होते. यात्रेचा व्यवस्थापक म्हणून मी मात्र ते मानले नाही, सोय झाली असती तर ठिक, नाही कांही विपरीत झाले असते तर . आम्ही दुरून पाहिलेल्या त्या झोपडी वजा घरात उतरलो, इथे विद्युत् शक्तीची सोय नव्हती, मेणबत्ती वर भागवावे लागले, पावसाला सुरुवात झाली होती रूम मध्ये पाणी थेंब थेंब गळे चालू होते, बाजूला एक छोटेसे टपरी हॉटेल होते त्यांनी गरम गरम फुलके आणि दाल fry दिली ज्याची चव तोंडात अजून आहे. दुलई पांघरून जे झोपलो ते सकाळी ५.३० लाच डोळे उघडले. दरवाजा उघडला , समोर हिरव्यागार पर्वतांच्या रांगा व तेथून वाकून जणू नमन करणारे ढग, अंधुकश्या धुक्याची चादर पसरली होती. प्रत्येकाने आपला क्यामेरा काढून ते दृश टिपून घेतले. रात्री तेथे राहण्याचा निर्णय घेतल्याचे सार्थक झाले असे वाटले, कारण आतापर्यंतच्या प्रवासात इतकी सुंदर झोप व जेवण कोठेच झाले नव्हती. लड्डा च्या बायकोने बरोबर उपमा साहित्य भाजून आणले होते, त्या टपरीत पाणी गरम करून असा अप्रतिम उपमा केला की सगळ्यांनी त्याचा फडशा पाडला, सोबत चुत्टा चूर्म्याचे लाडू पण होते. चोपटा गावाचे महत्व असे आहे की येथील ३ ते ४ की. मी. टेकडीवर चढल्यावर उत्तरखंडातील चारी धाम येथून दिसतात . त्या चारी धामाना आणि चोपटा गावाला सलाम करून, आम्ही पुढच्या प्रयाणास सिद्ध झालो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा