२३ जून २०११, सकाळी ८.०० वाजता काचीगुडा स्टेशन वरून दोन धाम यात्रे साठी प्रवासास सुरुवात केली. लड्डा(माझे एक स्नेही) संपूर्ण परिवार निरोप देण्यास आला होता, आम्हाला सोडण्यास येण्याचे सौजन्य सनीने दाखविले, बरे वाटले . गाडी वेळेवर सुटली, काचीगुडा स्टेशन असल्याने लहानपणीच्या आठवणी उचंबळून येत होत्या, पण त्याना बांध घालावा लागला. पहिले दोन तास सामान नीट ठेवण्यात आणि न्याहारी करण्यात गेला. नंतर थोडा वेळ प्रवासाची पकड घेण्यात गेला. मी आणि लड्डा यांनी पत्ते खेळण्यास सुरुवात केली, ते जेवणाची हाक येईपर्यंत, मराठी, मारवाडी व आंध्रा अश्या संममिश्र जेवणाचा फडशा पाडला , थोडी विश्रांती घेतोय तोच नागपूर आले. सत्तर वर्षाचे नरेश काका स्टेशनवर भेटण्यास आले होते, त्यामुळे बरे वाटले. रघु काका व काकू ह्यांची सोबत आम्हाला नागपूर पासून मिळाली. सगळ्यांचा परिचय झाला, इकड तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग रात्रीच्या जेवणाची वेळ केंव्हा झाली कळालेच नाही. काकुनी आणलेल्या मुगाच्या डाळीच्या खिचडीचा स्वाद घेत , जेवण उरकले, व सर्वांनी आप आपल्यास निद्रेच्या स्वाधीन केले. प्रवासाच्या पूर्व तयारीच्या थकव्यामुळे झोप छान झाली, सकाळी ९.३० च्या सुमारास गाडी निझामुद्दीन स्टेशनवर पोह्न्चली. दादरा चढून १ नम्बर्च्या प्लाट फार्मवर आलो. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखे झाले तर प्रवासातला त्रास कसा कळणार, हरिद्वारला जाणारी गाडी ७ तास लेट, मग काय प्लाटफार्म वर चादरी घालून, फत्कली मारून " वर्हाड निघालाय लंडनला " चा सेट निर्माण केला. गाडी जरी वेळेवर येणार नसली तरी, पोटातल्या भुकेने योग्य वेळ होताच शिट्टी मारली, आणि मग सगळ्यांनी पुरण पोळ्या व चीत्रानावर ताव मारला, कसेबसे २ वाजले, कोणी मधेच, बाहेर जाऊन येत होते, कोणी चहा पाण्याला, कोणी चौ मौ करायला, तर कोणी लेट येणार्या गाडीची पुन्हा पुन्हा चौकशी करण्यास जाऊन वेळेचा सदुपयोग करत होते, मी माझी सौ आणि आमच्या काठ्या घेऊन सामानाचे संरक्षण करण्याचा असफल प्रयत्न करत होतो. मला वाटते शेवटी रेल्वेला आमची दया आली, व हरिद्वारला जाणारी गाडी एकदाची येऊन ठेपली, आम्ही गाडीत स्थानापन्न झालो आणि जी गाण्याच्या भेन्ड्याना सुरुवात केली, ती तब्बल २ तास , ' मला जाऊ द्या न घरी' हे तेलुगु भास्कर ने म्हणलेले गाणे, तर लड्डा नी ' क्या खूब लागती हो ? ' हे स्वताच्या बायकोसाठी म्हटलेले गाणे खास लक्षात रहाण्यासारखे होते, बाकी रमया वसता वया, दम मारो दम, किंवा हम तो तेरे आशिक हैं, ही गाणी नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे होतीच. पुन्हा एकदा पोटाला इंधन देऊन सर्वांनी झोपेचा आसरा घेतला, ते एकदम , पहाटे ३.३० ला हरिद्वार स्टेशन येईपर्यंत. पहाटेची वेळ व्हील चेअरची कमतरता, सगळ्याला सामोरे जाऊन दादरा चढून स्टेशन बाहेर पडलो. येथे विद्यानी छान साथ दिली. स्टेशन बाहेर आलो तर हसत मुखांनी स्वागत करणार्या रिंकू ह्या वाहन चालकाला बघून सगळ्यांनाच हायसे वाटले. ठरवूनही टेम्पोत चढण्यासाठी चौरंग घेण्याचे राहिले, पण 'कोई दिक्कत नही', असे म्हणून रीन्कुने लगेच एक ब्याग चा पायरी म्हणून आम्हाला उपयोग करून दिला . हॉटेलवर पोचेस्तवर मुसळधार पावसाने आमचे स्वागत केले. एकंदर सुरुवात छान गारव्याने झाली.
सगळ्यांनाच, पण विशेषतः लड्डा परिवाराला गंगा मैयात डुबकी मारण्याची व तिची आरती बघण्याची घाई झाल्याने , सर्वांनी जेम तें प्रातः विधी आटोपले आणि हर की पौडी (गंगेचा घाट) कडे धाव घेतली. "मानो तो मैं गंगा मां हुं ना मानो तो बहेता पानि", "गंगा मैयान तेरी पियरी चढीबो", "गंगा मैयान मे जब तक के पानि रहे" अश्या गाण्याच्या गजरात सर्व जण गंगा स्नानास गेले , आम्हा उभायातांसाठी मात्र गंगेला बादलीमध्ये समेटून आणण्यात आमचा रिंकू यशस्वी झाला. शुद्ध अंतकरणाने त्या गंगेत आम्ही शरीरशुद्धी केली, एक फक्कड चहा घेतला आणि रिंकू व त्याचा साथी पुरणसिंग ह्यांच्याशी गप्पा मारण्यात झकास वेळ घालवला. हरवणे, चुकणे, शोधणे ह्या गोंधळा शिवाय यात्रा झाली तर ती यात्रा कसली, आणि ह्याची नांदी, गणेश((माझा asistant) व भास्कर(गणेशचा मित्र) ह्यांच्या रस्ता चुक्ण्याने झाली. तास दीड तासाने एकदाचे ते योग्य ठिकाणी पोहोंचले. आमची टेम्पो पार्किंग मधूनबाहेर आली , ते दुतर्फा झाडे असलेल्या हरिद्वार - ऋषिकेश रस्त्यावर. कोठे आधुनिक हॉटेल्स, तर कोठे साधू सन्यासांची कुटीरे , पुलाखालून वाहणारी गंगा , तर कोठे हरिनामाचा गजर करत जाणारे भक्तगण. पावसाची भुरभूर व थंड पण सुसह्य अश्या वार्याचे झोत घेत आम्ही देवभुमीवर पुढील यात्रेसाठी पाऊले नव्हे ,गाडीच्या चाकाना गती दिली. ऋषिकेशला गाडी आणि आमच्या पोटाच्या टाक्या अनुक्रमे पेट्रोल, व इडली साम्बारने टच्च भरून केदारच्या मार्गावर लागलो. इथपासून सर्व २४० की मी चा रस्ता वळणा वळणाचा म्हणजेच घाट रोड आहे. अलकनंदा, प्रेयसी नाहि तर, अलकनन्दा नदी इथपासून ते देवभुमिवरिल् आमचा प्रवास पूर्ण होइपर्यन्त एखाद्या सखी सारखी आमच्या सोबत होती
सर्वसाधारण ताशी वेगाचा हिशोब घेता वाटले की, आपण ५ ते ६ तासात गौरीकुंडा पर्यंत मजल गाठू, पण हा घाटाचा रस्ता आहे , तसाच तो अरुंद पण आहे हे आम्ही पूर्णपणे विसरलो. रस्त्यात, रुद्र प्रयाग (अलकनंदा व मन्दाकिनिचा संगम), सोन प्रयाग (मंदाकिनी व भागीरथी चा संगम) डोळे भरून पाहिला. विरही, सीतापुर, चमोली, पिपलकोटी अशी कधी न ऐकलेली, न बघितलेली गांवे, कसबे, पार करून रामपूर ह्या गांवाला पोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले. थोडा,थोडा अंधार दाटावयास लागल्याने, ब्रेक जर्नी करण्याचे ठरविले. प्रवासाच्या सुरुवातीसच सुरक्षकतेच्या दृष्टीने रात्रीचा प्रवास टाळण्याचा करार पास केला असल्याने, कोणाचा विरोध नव्हता. अश्या रीतीने, देवभुमीवरील आमचा हा पहिला थांबा होता. निसर्गाच्या कुशीत वसलेले एक छोटे पण सोयीनी युक्त अश्या ह्या गावात, गरम गरम मराठी जेवण सेवनास मिळाले ही जमेची बाजू होती. गौरीकुंड, केदारनाथ ह्याची कल्पना करत झोपेच्या आधीन केंव्हा झालो समजले नाही. सकाळी नव्या उत्साहाने सगळे सात वाजता तयार झाले, व गाडीने गौरीकुंड च्या दिशेने प्रयाण केले. रस्त्यात अगदी कडेला एक छोट्याश्या धाब्यावर पंजाबी परांठा हाणला आणि ८.३० ला गौरीकुंडला पोह्न्चलो. हे गरम पाण्याचे झरे असलेले कुण्ड आहे, जेथे स्नान करून मग केदारनाथच्या दर्शनास जाण्याची प्रथा आहे. कुंडा पासून १ ते १.५ की मी अंतर गेल्यावर केदारच्या १४ की मी ट्रेकची सुरुवात होते. सगळ्या जणांनी कुंडा कडे आंघोळीसाठी धाव घेतली, गरम पाणी बादलीतून आमच्याकडे येणार असल्याने आम्ही उभयता एका टपरी हॉटेलच्या वळचणी खाली थांबलो. तेवढ्यात पाउस सुरु झाला , रेनकोट विकणारे आम्हाला रेनकोट विकण्यात सफल झाले. थंडीमुळे पायांच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत स्वतःला लोकरी कपड्यात गुंढाळून घेतलेच होते त्यावर हे रेनकोटचे चिलखत घालून रणांगणावर लढायला जाणार्या वीराप्रमाणे आम्ही ट्रेक चढण्यास सज्ज झालो. सगळे व्यवस्थित चालले होते ना जाणे विद्याला कोठून नाशिकच्या ३ - ४ बायका भेटल्या त्यांनी सांगितले की आज डोली मीलणार नाही, झाले, हिनी लगेच स्त्री स्वभावाला अनुसरून माझ्यावर तोफ धरली , पहा मी म्हणत होते ना आपण जायला नको, आता येथूनच नमस्कार वगैरे, मी शांत बसलो, आमची ग्यांग तोपर्यंत कुंडात डुंबून आली, व आम्ही ट्रेकचा रस्ता धरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा